खूप चाललो पुढे मी, पण मागे राहिलो,
स्वतःपासून दूर जात, स्वतःलाच हरवलो।
स्वप्नांच्या गर्दीत मी इतका गुंतत गेलो,
जग जिंकताना मात्र, जगणंच विसरत गेलो।
गर्दीतही एकटेपण बोचत राहिलं,
आपुलकीचं बोलणं परकं झालं।
विश्वास ठेवायला कोणी उरला नाही,
आणि स्वतःवरही विश्वास राहिला नाही।
अपयशाची राख मनावर साचली,
आशांची दिवटी हळूहळू विझली।
प्रत्येक जखम ओरडून काहीतरी सांगत होती,
पण ऐकायला माझ्याजवळ ताकद नव्हती।
मग एका शांत क्षणी मन थांबलं,
धावणाऱ्या पावलांनी शेवटी प्रश्न विचारला—
“हेच का आयुष्य?”
आणि उत्तर शोधताना परतीचा रस्ता दिसला।
मागे वळलो तेव्हा आठवणी रडत होत्या,
हरवलेले क्षण मला घट्ट धरत होत्या।
क्षमेसाठी हात जोडले, डोळे भरून आले,
स्वतःशीच पहिल्यांदा प्रामाणिक झालो मी खरे।
आता थोडा हलका झालो आहे आतून,
दुःख स्वीकारलं, पळ काढला नाही म्हणून।
परतीचा हा प्रवास वेदनेतून जातो,
पण याच वाटेवर माणूस पुन्हा जन्म घेतो।
जग अजून तेच आहे, मी मात्र बदललो,
जिंकायची हाव सोडून, जगायला शिकलो।
आयुष्य पुढेच जातं, हे खरंच आहे,
पण परतीच्या प्रवासातच
स्वतःशी भेट होते—हीच खरी कमाई आहे.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
प्रा.विजय व्ही अहिरे"विजयश्री"
No comments:
Post a Comment